

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या बोरीवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यगृहात सुमारे 26 वर्षांपूर्वी बसवण्यात आलेली अग्निशमन अलार्म सिस्टम व अन्य सुरक्षा यंत्रणा कालबाह्य झाली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रेक्षकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
1999 मध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. दरवर्षी अग्निसुरक्षा यंत्रेणेची देखभाल केले जात असले तरी, यंत्रणा कालबाह्य झाली आहे. वास्तविक ही यंत्रणा दहा वर्षानंतर बदलणे आवश्यक होते. परंतु याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले. आता या यंत्रणेबद्दल प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा दुरुस्त करण्यासह ती बदलण्यासाठी पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाला पत्र पाठवले होते.
मात्र याचीही दखल घेण्यात आली नाही. त्यांनी वारंवार स्मरण करून दिल्यानंतर महापालिकेने आता नवीन यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासाठी अजून दोन ते तीन महिने लागणार आहे.
दुरुस्तीची शिफारस
प्रशासकीय अधिकारी क्रिडा व मनोरंजन यांच्या समवेत प्रशासकीय अधिकारी व अग्निशमन यंत्रणेचे वार्षिक देखभाल करणाऱ्या कंत्राटदारासोबत नुकतीच पाहणी करण्यात होती. यातही ही यंत्रणा जुनी झाली असून मुख्य पंप व अन्य संलग्न उपकरणे कुचकामी झाली आहेत.
त्यामुळे यंत्रणा दुरुस्ती व बदली करण्याची शिफारस त्यांनी केली आहे. त्यानुसार ही यंत्रणा तातडीने बदलण्यात येणार आहे. यासाठी 84 लाख 29 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.