पुढारी ऑनलाईन डेस्क : हुंड्यासाठी पत्नीचा बळी गेला असेल तर संबंधित नवरा मृत पत्नीच्या संपत्तीत वारसा हक्क सांगू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हिंदू वारसा कायदा कलम २५ नुसार हा निकाल देण्यात आलेला आहे.
न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांनी २ जुलैला हा निकाल दिला आहे. हिंदू वारसा कायद्यात ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, त्याची संपत्ती खून करणाऱ्या व्यक्तीला वारसा हक्काने मिळू शकत नाही, पण या तरतुदीत 'खून' म्हणजे काय याची व्याख्या करण्यात आलेली नाही. न्यायमूर्तींनी या तरतुदींचे सविस्तर विवेचन या निकालात दिलेले आहे.
या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. माझ्या मुलीचा मृत्यू हा हुंडाबळीतून झालेला आहे. या प्रकरणात तिचा नवरा, आणि सासू, सासरे यांच्यावर दोषारोप सिद्ध झालेले असून ते सध्या तुरुंगात आहेत. त्यामुळे मुलीच्या संपत्तीत नवरा तिचा कायदेशीर वारस ठरू शकत नाही, असा दावा वडिलांनी केला होता.
या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या मृत्यूपत्र विभागाने हुंडाबळी आणि हिंदू वारसा कायद्यातील अपात्रतेसंबंधीचे खुनाची तरतुद यात फरक केला होता. त्यामुळे हुंडबळीत दोषारोप सिद्ध झाले म्हणजे हिंदू विवाह कायद्यानुसार वारसा हक्कासाठी अपात्र ठरवता येणार नाही, असा बचाव सादर केला होता. ही बातमी लाईव्ह लॉने दिलेली आहे.
न्यायमूर्ती म्हणाले हिंदू वारसा कायदा कलम २५नुसार ज्या व्यक्तीवर खुनाचा किंवा खुनाला प्रोत्साहन देण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे, अशी व्यक्ती वारसा हक्कापासून अपात्र ठरते. या तरतुदीचा हेतू असा आहे की ज्या व्यक्तींनी खून केला आहे, त्यांनाच खून झालेल्या व्यक्तीची संपत्ती मिळू नये. हिंदू वारसा कायद्यात 'खून' म्हणजे काय याची व्याख्या दिलेली नाही, हे जरी खरे असले तरी अशा स्थितीत खुनाचा सामान्य अर्थ काय होतो ते मान्य केले पाहिजे.