

मुंबई : मराठी माणसासाठी दोन भाई एकत्र आल्याने आता सरकारला भीती वाटत आहे. यामुळे आगामी काळातील महापालिका निवडणूका पुढे ढकलण्याची शक्यता आहे, अशी टिका शिवसेना युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी कांदिवली येथील आयोजित शिव संवाद कार्यक्रमात केली.
यावेळी कार्यक्रमात १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आली. यावेळी आमदार विलास पोतनीस, माजी आमदार विनोद घोसाळकर, विभागप्रमुख उध्देश पाटेकर, माजी नगरसेविका माधुरी भोईर, माजी नगरसेवक योगेश भोईर, विधानसभा संघटक रवीभाई हिरवे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणूका झाल्यावर आपले सरकार येणार, ३०० जागा येतील, असे सर्व महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि नेत्यांना वाटत होते, परंतु हे तीन पक्षानी मिळून कुठेतरी गडबड केली. देवेंद्र फडणवीस जास्तीच्या मतांमुळे जिंकले आहेत. महायुतीच्या विधानसभेच्या ११८ मतदार संघामध्ये ४७ लाख मतदान वाढविले, हे मते आले कुठून, असा सवालसुध्दा ठाकरे यांनी उपस्थित केला. अदानीच्या घश्यात १६०० एकर जमीन घातली घातली. धारावीतील लोकांना देवनारमधील कचऱ्यांच्या ढिंगारावर टाकले जात आहे. आमचे सरकार असतांनाउध्दव ठाकरे यांनी ५०० फूटांवरील घरे करमुक्त केली. मात्र आता महायुती सरकार मुंबईकरांवर महापालिकामार्फत विविध कर लावू मुंबईकरांची लूट करत आहे.
ज्यांना सर्व काही दिले, ते सर्व निर्लज्जासारखे पळाले, गद्दार झाले. बुक्के मारणारे, चड्डी बनियालवर बसणारे ते आहेत. मात्र खरा शिवसैनिक हा तुमच्यामध्ये आहे. योगेश भोईर यांना अनेक आमिषे दाखविण्यात आले, धमक्या आल्या, परंतु ते वाकले नाही, झुकले नाही. यामुळे अशा लोकांसाठी आमच्याकडे खास जागा आहे. सर्वकाही असतांना सर्व जण चिकटतात, मात्र जेव्हा काही नसते, तेव्हा जो साथ देतो, तो निष्ठावंत असतो. मी या वॉर्डासाठी निश्चितपणे माझा फंड देईल, अशी ग्वाहीसुध्दा आमदार आदित्य ठाकरे यांनी कार्यक्रमात दिली.
पहिलीपासून तिसरी हिंदी भाषा कशासाठी, मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे भाजपावाले लोकचं हिंदीविरोधात मराठी वाद निर्माण करत आहेत. यामुळे तुमचे हात घाण करून घेवून नका, या वादात पडू नका. शिरसाटसारखे वाद पुढे आणून इतर विषयांकडे दुर्लक्ष करून आपल्यांमध्ये भांडणे लावली जात आहेत. यामुळे नागरिकांना महाराष्ट्र लूटाची माहिती द्या. ते भ्रष्टाचाराचा उलटा पाऊस आपल्यावर पाडून घेत आहे. यासाठी आपल्याकडील असलेल्या छत्रीचा वापर करा, असे आवाहनसुध्दा ठाकरे यांनी उपस्थितांना केले.