

मुंबई : मुंबईच्या महापौरपदी भाजपा-शिवसेनेचा महापौर बसणार असला तरी, विविध समित्यांच्या सदस्य नियुक्तीच्या तांत्रिक घोळामुळे आता भाजपा-शिवसेनेचा एकच गट स्थापन करण्यावर महायुतीमधील नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे मंगळवारी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी आलिशान एसी बसमधून कोकण भवन दिशेने निघालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांना रोखण्यात आले.
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीकडे बहुमत असल्यामुळे त्यांचे महापौर व उपमहापौर विजयी होणार आहेत. पण स्थायी समितीसह विविध समित्यांवर सदस्य नियुक्ती करताना सत्ताधारी भाजपा-शिवसेना व विरोधी पक्षाचे एकसमान सदस्य राहणार आहेत. त्यामुळे या समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसह विकास कामांचे विविध प्रस्ताव मंजूर करताना सत्ताधारी म्हणून महायुतीची डोकेदुखी वाढू शकते. एवढेच काय तर सत्ताधाऱ्यांना अध्यक्षपद गमावण्याचीही भीती आहे. पण भाजपा व शिवसेनेने एकत्र गट स्थापन केल्यास सर्वच समित्यांमध्ये सत्ताधाऱ्यांची सदस्य संख्या एक ते दोनने वाढणार आहे. हा तांत्रिक घोळ भाजपा व शिवसेना नेत्यांच्या लक्षात येताच, स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी कोकण भवन दिशेने निघालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना रोखण्यात आले. त्यामुळे भगवी शाल खांद्यावर घेऊन, एसी बसमधून निघालेले नगरसेवक पुन्हा आपापल्या घरी निघून गेले.
समिती सदस्य नियुक्तीचा तांत्रिक घोळ दूर करण्यासाठी मंगळवारी दुपारी शिवसेना व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठकही पार पडली. या बैठकीत एकत्रित गट स्थापन करून, शिवसेनेला सभागृहनेते पद देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे समजते. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी याबाबत वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याचे समजते. या बैठकीनंतर कोकण भवन येथील कोकण विभागीय आयुक्तांकडे जाऊन भाजपा शिवसेना महायुतीच्या गटाची एकत्रितरित्या नोंदणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष पद धोक्यात
मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपा-शिवसेना महायुतीची सत्ता येणार असली तरी, महत्त्वाच्या 4 वैधानिक समित्यांमधील सुधार समितीत सत्ताधारी व विरोधकांचे सदस्य समसमान राहणार असल्यामुळे अध्यक्ष पद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक असले तरी एकूण नगरसेवकांच्या संख्येवर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यात येते. सध्याच्या नगरसेवक संख्येनुसार भाजपा शिवसेना महायुतीचे 13 सदस्य सुधार समितीवर जातात. तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, एमआयएमचे 13 नगरसेवक सदस्य होणार आहेत. त्यामुळे सुधार समिती अध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांना समसमान मते पडणार आहेत. अशावेळी चिठी उडवून अध्यक्षपदाची नियुक्ती करावी लागणार आहे. यात विरोधकांच्या बाजूने शिट्टी पडल्यात महापालिकेत सत्ता असूनही सुधार समितीवर विरोधी पक्षाचा नगरसेवक अध्यक्ष म्हणून विराजमान होऊ शकतो.