

मुंबई: मुंबई शहर व उपनगराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील भातसा धरणातील पाणीसाठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. या धरणामध्ये 27 टक्के पाणीसाठा शिल्लक असून ऑक्टोबर 2025 पासून एप्रिलपर्यंत या धरणातून तब्बल पाच लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी उचलण्यात आले आहे.
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी राज्य सरकारच्या भातसा धरणातून दररोज सरासरी 1850 दशलक्ष लीटरपेक्षा जास्त पाण्याचा पुरवठा होतो. या धरणामध्ये अन्य धरणांच्या तुलनेत चार पटीने जास्त पाणी साठवण्याची म्हणजेच 7 लाख 17 हजार दशलक्ष लिटर इतकी पाणी साठवण्याची क्षमता आहे. हे धरण 2025 मध्ये काठोकाठ भरले होते. परंतु ऑक्टोबरनंतर एप्रिलपर्यंत या धरणातून 5 लाख दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचा उपसा झाला. त्यामुळे तलावामध्ये 1 लाख 93 हजार दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे
त्यामुळे मुंबई महानगरपालिकेला 10 टक्के पाणीकपात करणे क्रमप्राप्त झाल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई शहराला 3,950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो यापैकी जवळपास निम्मे पाणी भातसा धरणातून आणले जाते. त्यामुळे या तलावामध्ये जास्तीत जास्त पाणीसाठा असणे मुंबईकरांसाठी फायदेशीर असते. परंतु आता पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणीकपात लागू करून या धरणातील काही पाणी वाचवले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत भातसा धरणातील पाणीसाठा सुमारे 16 हजार दशलक्ष लीटरने जास्त आहे. तरीपण ऑगस्टपर्यंत या धरणातील पाणी मिळावे यासाठी पाणीकपात करण्यात आल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा व ठाणे जिल्ह्यातील महापालिकेच्या तानसा धरणातील पाणीसाठा 22 टक्केवर आला आहे.
या दोन्ही तलावांत आता 85 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही धरणांची 3 लाख 70 हजार दशलक्ष लिटरपेक्षा पाणी साठवण्याची क्षमता आहे.
तलावातील पाणीसाठा
अप्पर वैतरणा - 51,843 (22.83 टक्के)
मोडक सागर - 44,634 (34.62 टक्के)
तानसा - 33,290 (22.95 टक्के)
मध्य वैतरणा - 62,933 (32.52 टक्के)
भातसा - 1,93,944 (27.05 टक्के)
विहार - 14,535 (52.48 टक्के)
तुळशी - 2,942 (36.57 टक्के)