

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बारा संघटनांनी मिळून केलेल्या मागण्यांवर बेस्ट प्रशासनाकडून मंगळवारी संयुक्त बैठक घेतली. मात्र बैठकीत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे येत्या १८ जूनच्या संपावर आम्ही ठाम असल्याची माहिती समर्थ कामगार संघटनेचे सहचिटणीस विलास पवार यांनी दिली.
निवृत्त कामगारांची सुमारे १ हजार कोटीपेक्षा जास्त देणी शिल्लक असताना महापालिकेने केवळ ५०० कोटी वर्ग केले आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळकाढूपणा केला असल्याचा आरोपही संयुक्त समितीने केला आहे. मात्र बेस्ट समिती अध्यक्षांनी बैटकीत सकारात्मक चर्चा झाली असून कामगार संघटनांनी संप करावा अशी स्थिती नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.
दादर येथे बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीचा नुकताच मेळावा झाला. यात कामगारांनी ९ प्रमुख मागण्या प्रशासनाकडे करीत मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनांची संयुक्त बैठक मंगळवारी कुलाबा बेस्ट भवन येथे झाली.
यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, बेस्ट प्रशासनाच्या महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठीयांनी संयुक्त कृती समितीशी चर्चा केली. मात्र ९ प्रमुख मागण्यांवर बैठकीत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरल्याचा आरोप करत येत्या १८ जूनपासून कामगार संपावर जाण्यासाठी आम्ही ठाम असल्याचे संयुक्त कृती समितीचे जाहीर केले आहे.
निवृत्त कामगारांची सुमारे १ हजार कोटींपेक्षा जास्त देणी शिल्लक आहेत. असे असताना केवळ ५०० कोटी महापालिकेने वर्ग केले आहेत. यामध्ये ३१४ कोटी निवृत्तीवेतनसाठी आहेत, तर उरलेले पैसे इतर कामांसाठी बेस्ट वापरणार आहे. याचा अर्थ ५०० कोटींची खैरात देऊन बेस्ट प्रशासनाने वेळकाढूपणा केला असल्याचा आरोप संयुक्त समितीचा आहे.
एकाच वेळी देणी द्या!
२०२४ पासून निवृत्त सुमारे ६ हजार कामगार निवृत्त आहेत. त्यांची देणी देण्यासाठी १५ ते १६ कोटी बेस्टला हवे आहेत. मात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना एक एक महिन्याचे शंभर टक्के देणी दिली जाणार आहेत. मात्र त्यांना एकाचवेळी सर्व देणी हवी आहेत.
बेस्टच्या संयुक्त बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आणि संयुक्त समितीने दिलेल्या कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार झाला. निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन आदेशांवर चर्चा झाली. कामगारांच्या मागण्यांसाठी प्रशासन सकारात्मक आहे. कायदेशीर व आर्थिक चौकटीतून रखडलेले प्रश्न मार्गी लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात अजनू ५०० कोटी मिळाले की अनेक प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे कामगार संघटनांनी संप करावा अशी स्थिती नाही.
- तृष्णा विश्वासराव, अध्यक्ष बेस्ट समिती