

मुंबई; वृत्तसंस्था : महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी राज्यभरात मोठी धडक कारवाई केली. पाकिस्तानस्थित गँगस्टर शाहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह राज्यातील 40 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, 53 संशयितांची चौकशी सुरू आहे. बुधवारी सकाळपासूनच एटीएसच्या पथकांनी मुंबई आणि उपनगरे (मिरा रोड, नालासोपारा) पुणे, नाशिक आणि जळगाव, अकोला, नांदेड, चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी छापे टाकले.
अधिकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजाद भट्टी हा परदेशात बसून आपली टोळी चालवतो. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. दरम्यान, एटीएस पथकाने गोंडपिपरी येथील एका विद्यार्थ्याची चौकशी केली.
राज्यातून ताब्यात घेण्यात आलेल्या 53 जणांचे शाहजाद भट्टीशी नेमके काय संबंध आहेत आणि ते कोणत्या स्वरूपाच्या कारवायांमध्ये सहभागी होते, याचा तपास आता एटीएस करत आहे. दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील या छाप्यांमुळे गुन्हेगारी आणि दहशतवादी गटांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.