

Sanjay Raut on Ashok Kharat case
मुंबई : "भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण साधे नसून, मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून गोपनीय माहितीची गळती करण्यात आली आहे," असा आरोप करत खरात प्रकरणाकडे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित म्हणून पाहता येणार नाही. सध्या खरात हा विषय मागे पडला असून, आता इतर अनेक महत्त्वाची माहिती समोर येणार आहे. येणाऱ्या काळात मोठे राजकीय वादळ येणार आहे, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १२) माध्यमांशी बोलताना केला. यावेळी अशोक खरात प्रकरणी गृहखात्याच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय राऊत म्हणाले की, "सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) ही अत्यंत संवेदनशील माहिती असते. ती मला सहज मिळणार नाही किंवा व्हॉट्सॲपवर पाठवली जाणार नाही. गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही CDR मिळू शकत नाही. मग ही माहिती कोणापर्यंत आणि कशी पोहोचली, हा मोठा प्रश्न आहे."
"ढोंगी बाबा खरातच्या पायाशी बसून फडणवीस यांच्या कार्यकाळातील नेत्यांची माहिती आता समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे काही सुधाकरराव नाईक नाहीत," असा टोलाही त्यांनी टोला लगावला.
जागतिक स्तरावर महायुद्ध संपवण्यासाठी तीन राष्ट्रे आणि काही प्रमुख नेते एकत्र आले आहेत, याकडे लक्ष वेधताना राऊत म्हणाले की, "हे जगातील सर्वात मोठे पाऊल आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिकडच्या प्रसिद्धी साहित्यावर किंवा बॅनरवर तिथल्या पंतप्रधानांचे किंवा राजकारण्यांचे फोटो नाहीत. हे एक आदर्श चित्र आहे. भारतात असे इव्हेंट असते, तर भाजपने आधीच कमळ छापून संपूर्ण देश बॅनरने रंगवून टाकला असता. पंतप्रधान मोदींनी जागतिक घडामोडींमधील भान काय असते, हे यावरून शिकले पाहिजे," असा टोलाही त्यांनी लगावला.
"आजकाल या देशात फक्त फडणवीस आणि त्यांच्या लोकांचाच हिंदुत्वाशी संबंध उरला आहे, असे त्यांना वाटते. बाकी आम्ही सगळे जणू काही बाहेरून आलो आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रात हिंदुत्व रुजवले आणि फडणवीसांना जगायला शिकवले, त्यांचे योगदान भाजप विसरली आहे. भाजपचे हिंदुत्व आता केवळ 'खरात' आणि 'येरेंडे बुवा' सारख्यांचे राहिले आहे, जे आम्हाला कधीही मान्य नाही. खऱ्या हिंदुत्वाचा विचार तर शंकराचार्य त्यांच्या मठात बसून मांडत आहेत," अशी टीका राऊत यांनी केली.
एका केंद्रीय मंत्र्याने आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमाला काही खासदार उपस्थित राहिले होते. यावर बोलताना राऊत म्हणाले की, "खासदार जेवायला गेले म्हणजे ती काही 'डिनर डिप्लोमेसी' होत नाही. तो केवळ एक जेवणाचा कार्यक्रम होता, त्याला राजकीय अर्थ देण्याची गरज नाही."