

मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून अॅप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला. या संपाची झळ जशी प्रवाशांना बसली अशीच हातावर पोट असलेल्या अॅप आधारित टॅक्सी-रिक्षा चालकांना बसली. शेवटी नाईलाजाने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र मंगळवारी मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा मोठ्या संख्येने चालक संपावर जातील, असा इशारा चालकांच्या महाराष्ट्र कामगार सभा या संघटनेने दिला आहे.
संप मागे घेण्यात आला असला तरी प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अॅप आधारित सेवेसाठी लागू करण्याची प्रमुख मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईतील अॅप आधारित टॅक्सी चालकांनी प्रतिकिमी 32 रुपयांप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांना सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. संपकर्यांनी आरटीओला मंगळवारपर्यंतची मुदत दिली आहे. आरटीओने मंगळवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुधवारपासून पुन्हा संप करण्याचा इशारा दिला आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित केलेले दर सर्व अॅप आधारित सेवेसाठी लागू करावे, अशी मागणी राज्यभरातील चालकांकडून करण्यात येत होती. यासाठी सीएसएमटी येथील आझाद मैदानात संप आणि अनिश्चित कालावधीसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते. या संपाला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. ओला, उबरसारख्या अॅप आधारित टॅक्सी चालकांना प्रतिकिमी 8 ते 9 रुपये भाडे देण्यात येत. हे भाडे फारच तुटपुंजे आहे असे चालकांचे म्हणणे आहे.
नालासोपारा येथील एका चालकाने आर्थिक अडचणींमुळे जीवन संपवले. या घटनेमुळे सर्व चालक आझाद मैदानात एकवटले. त्यानंतर प आधारित टॅक्सी - रिक्षा चालक, त्यांचे नेते आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक पार पडली.
या बैठकीत चालकांच्या समस्या, मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. अनिश्चित भाडेदरामुळे चालकांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत आहे. त्यामुळे आरटीओने निश्चित केलेल्या दरानुसार भाडे ठरवावे, अशी मागणी चालकांनी केली. या मागण्यांबाबत आरटीओ विचार करून मंगळवारपर्यंत निर्णय घेणार आहे.
पुण्यात ’ओन्ली मीटर’ हा प्रयोग यशस्वीरित्या राबवण्यात आला आहे. मुंबईकर प्रवासी देखील चालकांच्या सोबत असून सुरुवातीला काहीशी गैरसोय होईल. परंतु, वेळेत आणि योग्य प्रवासाला मुंबईकराचे प्राधान्य असते. त्यामुळे ’ओन्ली मीटर’ द्वारे आकारण्यात येणार्या दरामुळे प्रवासी आणि चालक या दोघांचेही हित साध्य होईल.
डॉ. केशव क्षीरसागर, अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा