

मालाड : गोरेगाव पश्चिमेतील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे मैदानाचे अस्तित्व आणि मूळ आरक्षण वाचवण्यासाठी 'अण्णा भाऊ साठे मैदान बचाव समिती'तर्फे पी/दक्षिण महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
पूर्वकल्पना देऊनही सहाय्यक महापालिका आयुक्त मोर्चेकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी उपस्थित न राहिल्याने तसेच चर्चेसाठी आलेल्या अधिकाऱ्याने सर्व जबाबदारी म्हाडा प्रशासनावर ढकलल्याने मैदान बचाव समितीने पालिकेच्या बेजबाबदार कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
आंदोलकांचा आरोप
महापालिकेच्या विकास नियोजन नियमावलीनुसार, प्रत्येक नागरी प्रभागात क्रीडांगण व उद्यानांचे निश्चित क्षेत्रफळ असणे बंधनकारक आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन धोरणानुसार नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि निवाऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पुरेशा प्रमाणात उघडी-मोकळी मैदाने असणे आवश्यक आहे. असे असतानाही म्हाडा आणि महापालिकेच्या संगनमताने हे हक्काचे मैदान हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
शिष्टमंडळ जाब विचारणार
७ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजता सहाय्यक आयुक्तांसोबत बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात महापालिकेकडून लेखी हमीची मागणी केली जाईल. पालिका प्रशासनानंतर आता अण्णा भाऊ साठे मैदान बचाव समितीचे शिष्टमंडळ म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना जाब विचारणार आहे.
आंदोलनाचा इशारा
‘मैदान वाचवा – मुलांचे भविष्य वाचवा’ आणि ‘अण्णा भाऊ साठे मैदान – आमचा हक्क, आमचा अभिमान’ अशा घोषणा देत गोरेगावकरांनी आपला रोष व्यक्त केला. जर प्रशासनाने योग्य निर्णय घेतला नाही, तर एक जनहित याचिका आणि लोकशाही मार्गाने यापेक्षाही आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा बचाव समितीने दिला आहे.