

मुंबई: सोलापूरच्या गिर्यारोहकांनी हिमाचलमधील 6080, मीटर उंचीच्या माउंट शिनकुन शिखरावर 79 तिरंग्यांचे भव्य ध्वजतोरण करून स्वातंत्र्याचा उत्सव आगळ्या पद्धतीने साजरा केला. या टीममध्ये मुंबईच्या वैभव ऐवळे यांच्यासह बाळकृष्ण जाधव, निखिल यादव आणि सुनील खट्टे या अनुभवी गिर्यारोहकांचा समावेश होता.
ही मोहीम 9 ऑगस्ट रोजी सोलंग व्हॅली येथून (हिमाचल प्रदेश) सुरू झाली होती. उणे तापमान, ऑक्सिजनची कमतरता, जोरदार वारे, हिमवृष्टी, मोरेन्स आणि उच्चतेमुळे उद्भवणार्या आव्हानांवर मात करत टीमने माउंट शिनकुनचं शिखर सर केले.
माउंट शिनकून हे हिमाचलमधील मध्यम कठीण श्रेणीत गणले जाणारे शिखर आहे. 70-80 अंशाच्या कोनात अंगावर येणारी चढाई करताना टेक्निकल उपकरणांचा आधार घ्यावा लागतो.टीमने दारचा गावातून ट्रेकला सुरुवात केली. हे गाव जवळपास 3360 मीटर उंचीवर वसलेले आहे. दुसर्या दिवशी पुढे उंचीपर्यंत जाऊन (कलमटायझेशन वॉक) पुन्हा बेस कॅम्पला (4600 मीटर) रात्रीचा मुक्काम केला.
वेगाने वाहणारे वारे आणि जवळपास 0-1 अंश सेल्सिअस तापमान असतानाही टीमने बेस कॅम्प ते कॅम्प 1 (समिट कॅम्प) 5100 मित्र उंचीवर नेला. समिट कॅम्प ते समिट जवळपास 8 ते 9 तासाच्या प्रवासात गिर्यारोहकांचा कस लागला. पण मागील अनुभव आणि शारीरिक व मानसिक तयारीच्या जोरावर ही मोहीम फत्ते केली.