NCP Sharad Pawar Symbol : मोठी बातमी! 'तुतारी' हे शरद पवार गटाचं नवं चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय | पुढारी

NCP Sharad Pawar Symbol : मोठी बातमी! 'तुतारी' हे शरद पवार गटाचं नवं चिन्ह; निवडणूक आयोगाचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हे चिन्ह देण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. ‘तुतारी’ पक्ष चिन्ह मिळताच “दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” अशा आशयाची पोस्ट शरद पवार गटाच्या वतीने सोशल मीडियावर करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष दोघांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे देण्यात आला. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव देण्यात आले होते. त्यानंतर शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्ष चिन्हावर ताबा कुणाचा यावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ हे नाव वापरू देण्याची मागणी शरद पवार गटाने केली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला सदर नाव वापरू द्यावे आणि एक आठवड्याच्या आत शरद पवार गटाला उपलब्ध चिन्हांपैकी चिन्ह देण्यात यावे, असे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. या निर्देशांचे पालन करत निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे. शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’च्या वतीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या चिन्हाची प्रसिद्धी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुढील प्रमाणे लक्षवेधी पोस्ट करण्यात आली:
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्याने ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी खा. शरदचंद्र पवार यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!”

Back to top button