मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) मागील दोन वर्षात ७१ प्राणी-पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्राला दिलेल्या लेखी उत्तरात ही आकडेवारी समोर आली आहे.
राणीच्या बागेत १ एप्रिल २०२२ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीत ४७ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची बाब मुंबई पालिकेच्या अहवालातून उघड झाली होती. त्यामुळे या प्राणिसंग्रहालयात पक्षी आणि प्राण्यांच्या आहार, आरोग्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा आमदार यामिनी जाधव यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला होता. या प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच प्राणी आणि पक्ष्यांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहितीही विचारली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सादर केलेल्या लेखी उत्तरात ४७ नव्हे, तर तब्बल ७१ प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हे सर्व मृत्यू वृद्धापकाळ, रक्तस्त्राव, संसर्ग, तणाव यांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना त्यांच्या विहित खाद्यतक्त्यानुसार नियमित योग्य सकस आहार पुरविला जात असून, त्यांच्या आरोग्यविषयक देखभालीकरिता तेथे पूर्णवेळ पशुवैद्यकीय डॉक्टर नेमण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आली आहे.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याकडील मानकांनुसार प्राणी संग्रहालयातील सर्व वन्यप्राणी-पक्ष्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, लसीकरण, करण्यात येते. प्राणी-पक्ष्यांच्या देखभालीमध्ये प्राणिसंग्रहालय यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष झालेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे.