'आम्हाला एकत्र येऊन कोणाच्याही खुर्चीखाली फटाके फोडायचे नाहीत', उदय सामंत ठाकरे गटावर टीका
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राणे कुटुंबीय आणि सामंत कुटुंब कोकणातील आहे. दोन्ही कुटुंबांचे संबंध चांगले आहेत. आम्हाला एकत्र राहून कोकणाचा विकास करायचा आहे, आम्ही एकत्र येऊन आम्हाला कोणाच्याही खुर्चीखाली फटाके फोडायचे नाहीत, असे म्हणत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता ठाकरे गटावर टीका केली.
काही दिवसांपूर्वी कोकणात उदय सामंत आणि निलेश राणे यांचे एकत्र बॅनर झळकले होते. याबद्दल उदय सामंत बोलत होते. याबद्दल पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, काही तात्विक गोष्टींवर आमचे मतभेद असू शकतील मात्र आमचे संबंध सलोख्याचे आहेत. काही दिवसांपूर्वी माझे बंधू आणि निलेश राणे यांचीही भेट झाली. दरम्यान आमचे एकत्र लागलेले बॅनर हे कोणाच्याही खुर्चीखाली फटाके फोडण्यासाठी नसून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत हे दाखवून देण्यासाठी आहेत, असेही ते म्हणाले. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्र राज्याच्या दालनाचे उद्घाटन करण्यासाठी ते दिल्ली दौऱ्यावर होते. या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, ज्या लोकांनी आम्ही गुवाहाटीमध्ये असताना महिलांची अवहेलना करणारे शब्द वापरले त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी, कोण काय आहे हे कोणी सांगायची गरज नाही. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाने कोण कुठे आहे हे दाखवलेले आहे, यात ठाकरे गट सातव्या क्रमांकावर असल्याचेही ते म्हणाले. दरम्याम, शरद पवार, अजित पवार भेटीवर बोलताना ते म्हणाले की पवार कुटुंबीयांच्या भेटीकडे राजकीय घडामोड म्हणून बघू नये, ते दरवर्षी एकत्रच दिवाळी साजरी करतात. त्यांच्या भेटीत राजकीय काही असेल तर त्यावर स्वतः शरद पवार, अजित पवार बोलू शकतील, असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.