संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते : नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट | पुढारी

संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते : नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत यांना मुख्यमंत्री व्हायचे होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे ( शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. यासाठी त्यांनी आपसात भांडणे लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न हा अयशस्वी झाला असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. राऊत यांनी नगरसेवकाची निवडणूक लढून जिंकून दाखवावी. आमदारामुळे राऊत हे निवडून आले आहेत.उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांपासून तसेच हिंदुत्वापासून दूर ठेवण्याचे काम राऊत यांनी केले, असा दावाही म्हस्के यांनी ठाण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदारांची बैठक घेऊन २२ जागांचा आढावा घेतला, त्याचा बी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हस्के यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्व निवडणुका जिकणे, हाच सर्वांचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ४८ लोकसभा जागा महायुती एकत्रितपणे लढणार आणि जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे. राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा पतंप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिंकायच्या आहेत, असे बावनकुळे यांनी म्हटले. यामुळेच प्रत्येक पक्षाचा नेता राज्यभर फिरून काम करत आहे. तिन्ही पक्षात कोणतीही नाराजी नाही, युतीमुळे काही फायदे तर काही तोटे आहेत, पण, त्यावर वरिष्ठ तोडगा काढतात, असेही म्हस्के म्हणाले. उशिरा का होईना राजन विचारे यांच्यावर विश्वास ठेवला गेला, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा होता, तेव्हा राऊत आपली भूमिका काय होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर तुम्ही उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्या बद्दल काय बोललात ते सांगा, तुमची त्यावेळची तुमची भूमिका काय होती ती सर्वांना कळू दया. कुलदैवताची शपथ घेऊन सांगा हे खोटे होत नाहीतर काही दिवसांत आम्ही सर्व लोकांसमोर आणू, असे आव्हानही म्हस्के यांनी राऊत यांना दिले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवाजी पार्कवर हिंदुत्वाचे विचार द्यायचे त्यामुळे त्याला शिवतीर्थ म्हटले जायचे. परंतू त्या ठिकाणी आज भंगार मनोवृत्तीचे विचार सांगितले जाणार आहेत. त्या ठिकाणी भंगार मनोवृत्तीची भाडोत्री माणस जाणार आहेत. तर आमच्याकडे हिंदुत्वाच्या विचारांचे अंगार असणारी सच्चे शिवसैनिक जाणार आहेत. असा टोला शिवसेना त्यांनी यावेळी लगावला.

Back to top button