नवी दिल्ली, २४ जून, पुढारी वृत्तसेवा, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पंख छाटले जात आहेत,असा धक्कादायक दावा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी केला.अजित पवार यांनी पक्षांतर्गत छोटीशी जबाबदार मागितली असेल.पंरतु, ते त्यांना कशी मिळणार नाही याची व्यवस्थित काळजी घेतली जाते आहे ; याचे दुःख होते, अशी प्रतिक्रिया केसरकर यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलतांना व्यक्त केली.
दरम्यान, भारत राष्ट्र समितीच्या राज्य समन्वयकाने (बीआरएस) पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.यावर प्रश्नविचारला असता, पंकजा मुंडेंचे भाजप सोबतचे अतुट नाते आहे.त्यांचा भाजपमध्ये योग्य मान राखला जाईल, असे सूचक वक्तव्य केसरकरांनी केले.
मणिपूर जळत आहे, अशात राज्याच्या जखमेवर फुंकर घालणे गरजेचे आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांसारख्या नेत्यांच्या अनुभवाची गरज आहे. या बैठकीत पवारांनी उपस्थित राहणे आवश्यक होते,असे केसरकर म्हणाले. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असून प्राधान्याने घटक पक्षांचा विचार केला जाईल, असे सूचक वक्तव्य देखील केसरकरांनी केले.
कोरोना काळात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटर घोटाळ्याची सक्तवसुली संचालनालय (ईडी) चौकशी करीत आहे. संकटप्रसंगी पैसे कमावणे चुकीचे आहे. कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये ६५% लाईफ लाईन कंपनीचे कर्मचारी होती. पंरतु, उपचाराअभावी लोक तडफडून मरतात तेव्हा अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही. बाळासाहेब असते तर त्यांनी अशा लोकांवर कारवाई केली असती, असे मत केसरकरांनी व्यक्त केले.