महाविकास आघाडीमुळे भाजपला पोटशूळ; अरविंद सावंत यांची टीका
महाविकास आघाडी सरकारमुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. हे सरकार आज पडेल उद्या पडेल अशी मळमळ सतत होत असल्याने ते गरळ ओकत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली.
ते म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व कोणते आहे हे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले आहे. आपण हिंदू म्हणून जगूया आणि हिंदुस्थान हा माझा धर्म आहे, असे समजूनच आपण वागले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी जो सल्ला विरोधकांनी समजून घेतला पाहिजे. गेली दोन वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील हीच भाषा वापरत आहेत. अजूनही भागवत यांना आपल्याच माणसाला समजवता येत नसेल तर ते इतरांना काय समजणार?
सिंधुदुर्गातील भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले, जे शिवसेनेतून बाहेर पडलेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून काढले हे सत्य आहे. आज जो व्यक्ती शिवसेनेवर गरळ ओकत आहे त्यांना शिवसेनाप्रमुख व्हायचे होते. त्यासाठी ती तडफड होती. ती तडफड पूर्ण झाली नाही म्हणून ते बाहेर गेले. पडले. मराठी ह्रदयसम्राट अशी उपाधी लावून गर्व से कहो हम हिंदू है वाले कालपरवापर्यंत वावरत होते. त्यामुळे त्यांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही.