मुंबई : धारावीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून | पुढारी

मुंबई : धारावीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून

धारावी; पुढारी वृत्तसेवा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना धारावी क्रॉस रोडवरील पालवाडी गोपाळ मिस्त्री चाळीत बुधवारी (दि. २७) रात्री घडली. रेणू सुरेश विश्वकर्मा (२८) असे या मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पती सुरेश विश्वकर्मा (वय ४५) याला शाहूनगर पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेश विश्वकर्मा हा पत्नी व तीन वर्षांच्या मुलासह पालवाडी गोपाळ मिस्त्री चाळीत राहत होता. त्याच्या पत्नीचे त्याच्याच मित्राशी अनैतिक संबंध असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीवर पाळत ठेवली. या अनैतिक संबंधाची खात्री होताच सुरेशने आपल्या पत्नीला जाब विचारला. पतीने घेतलेल्या अनैतिक संबंधावरून दोघात कडाक्याचे भांडण झाले. पत्नीच्या चारित्र्याबाबत शेजारच्या नातेवाईकांना समजल्याने पती प्रचंड मानसिक तणावाखाली वावरू लागला. एवढे होऊनसुद्धा पत्नी तिच्या प्रियकराची साथ सोडत नसल्याने अधूनमधून त्यांच्यात खटके उडत होते. बुधवारी रात्री सुरेश नेहमीप्रमाणे कामावरून घरी येताच दोघांच्यात भांडण झाले. या भांडणात पती सुरेश याने जवळच पडलेली लोखंडी कैची उचलून तिच्या गळ्यात खुपसली. कैची खुपसताच ओरडण्याचा आवाज झाल्याने शेजारी खडबडून जागे झाले. घटनास्थळावरील दृश्य पाहून ते हबकले. दरम्यान पती सुरेशने पत्नीच्या प्रियकराने हल्ला केल्याचा बनाव करत तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शाहूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची अधिक माहिती घेऊन संशयित आरोपी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शाहूनगर पोलीस ठाण्याचे पोनि श्रीशैल्य चिवडशेट्टी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Back to top button