पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. B.R. Ambedkar Jayanti) यांची १३२ वी जयंती. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर, 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम' असं लिहित एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना जयंतीनिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी (दादर), मुंबई येथे जाऊन महामानवाला विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओमध्ये काय म्हंटले वाचा त्यांच्याच शब्दात. (Dr.Babasaheb Ambedkar)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना कोटी कोटी प्रणाम. या जयंतीनिमित्त सर्व माता-भगिनी, बांधवांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. विश्व वंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सशक्त अशी राज्यघटना दिली. या संविधानाच्या बळावर आज आपला देश जगात एक सशक्त लोकशाही म्हणून उभा आहे.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेली वंचितांच्या कल्याणाची, समतेची, बंधुत्वाची शिकवण अंगिकारत त्यांचे विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून काम करत आहोत. समाजातील विविध घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सहभागी करुन घेण्यासाठी आमचा सामाजिक न्याय विभाग प्रयत्नशील आहे. त्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती या सारख्या संस्था काम करु लागल्या आहेत. या संस्थामधून त्या त्या समाज घटकांसाठी आपण काम करत आहोत.
राजर्षी शाहू महाराज यांनी होतकरू विद्यार्थ्य़ांना शिक्षणासोबतच वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करुन दिली. त्यांच्या या संकल्पनेचे अनुकरण म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आज राज्यात ४४१ वसतिगृह आणि ९० निवासी शाळांमध्ये ६१,५०० विद्यार्थ्यांची निवास आणि भोजनाची उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे आपल्याला सर्वांसाठी आनंदाचा, उत्साहाचा, उत्सवाचा क्षण गोड व्हावा म्हणून आम्ही घराघरात आनंदाचा शिधा देखील पोहोचविला आहे. महामानवाचा जयंतीसोहळा प्रत्येक घरात साजरा व्हावा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान फुलावं म्हणून हा आम्ही उपक्रम आम्ही राबवत आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मूर्तीमंत प्रेरणास्त्रोत, त्यांचे मुंबईतील हिंदू मील येथील स्मारक वेळेत व्हावे यासाठी आम्ही प्राधान्य दिले आहे. हिंदू मीलमधील स्मारक हे केवळ आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील आंबेडकरप्रेमी लोकांसाठी, त्यांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरेल. यासाठी सुविधा दिल्या जातील, यावर भर देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. सुशासन आणि कल्याणकारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामागेही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अधिष्ठाण आहे. राज्याचा लौकीक असाच वाढत राहील यासाठी आम्ही कटीबद्ध राहू. याची ग्वाही मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देतो.