मुंबई : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांआधी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ही वाढ १ जानेवारी २०२४ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.
राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वीच ऊर्जा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे. त्यानंतर आता राज्य शासनातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या ४६ टक्के असलेला महागाई भत्ता ५० टक्के करण्यात आला आहे. ही महागाई भत्तावाढ १ जानेवारी २०२४ ते ३० जून २०२४ या कालावधीतील थकबाकीसह जुलै २०२४ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.