शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या रणरागिनी मंत्रालयावर धडकल्या  | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारविरोधात राष्ट्रवादीच्या रणरागिनी मंत्रालयावर धडकल्या 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा: ५० खोके,माजलेत बोके… ५० खोके,एकदम ओके…सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणा-या अब्दुल सत्तार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा… आटली की बाटली, कचकन फुटली, खोटे गुन्हे दाखल करताना लाज नाही वाटली… या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आज (दि.१६) सायंकाळी शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढला.

आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसची राज्यस्तरीय बैठक मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिलांनी कार्यालय ते मंत्रालयाकडे घोषणा देत कूच केली. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेली शिवीगाळ आणि शिंदे सरकार खोटे गुन्हे दाखल करत असल्याने महिलांच्या मनात प्रचंड चीड होती त्यातूनच आज राष्ट्रवादीच्या रणरागिनींनी थेट हल्लाबोल केला.

राष्ट्रवादीच्या शेकडो रणरागिनी सरकारविरोधात जोरदार घोषणा देत मंत्रालयाकडे निघाल्याचे समजताच पोलिसांची तारांबळ उडाली आणि मग भेटेल तिथे महिलांना अटक करण्याचा सपाटा लावला. मात्र पोलिसांच्या दंडेलशाहीला न जुमानता मंत्रालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण आणि राज्यातील त्यांच्या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी केले. याशिवाय मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे व पदाधिकारी, कार्यकर्ते हेही उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button