मुंबई : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याने विधिमंडळाचे रखडलेले पावसाळी अधिवेशन येत्या 17 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. मंगळवारी विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे. त्यात अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब होणार आहे. राज्याच्या नव्या मंत्र्यांचा सकाळी 11 वाजता शपथविधी होणार आहे. त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. बैठक होऊन अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाणार आहे.
या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून होईल, असे घोषित करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडले. दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाने सोमवारी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. अधिवेशन येत्या 17 ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय होणार असल्याचे समजते.