राऊत यांच्यानंतर ‘मविआ’मधील माजी मंत्री अस्लम शेख ईडीच्या रडारवर; मढ बेटावर १ हजार कोटींचा घोटाळा! वाचा काय आहे प्रकरण | पुढारी

राऊत यांच्यानंतर 'मविआ'मधील माजी मंत्री अस्लम शेख ईडीच्या रडारवर; मढ बेटावर १ हजार कोटींचा घोटाळा! वाचा काय आहे प्रकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र पर्यावरण मंत्रालयाकडून नुकतेच मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला नोटीस जारी करून मढ आईसलँडमधील चित्रपट स्टूडिओंच्या अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी आता मविआ सरकारमधील माजी वस्त्रोद्योग, मस्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री काँग्रेसचे आमदार अस्लम शेख हे ईडीच्या रडारवर आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 1000 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले असून हे स्टूडिओ पाडण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अहवालानुसार, आपल्या कार्यकाळात आमदार शेख यांनी मढ बेटावर जो किनारी प्रदेशाच्या नियमानुसार संरक्षित क्षेत्रात मोडते. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून तिथे चित्रपट स्टुडिओ बनवण्याची परवानगी दिली. मढ बेटावर 2 डझनहून अधिक फिल्म स्टुडिओंच्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली होती. पर्यावरण आणि वन मंत्रालयांकडे तक्रारी आल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) हे प्रकरण हाती घेतले. त्यामुळे संजय राऊत यांच्यानंतर आमदार अस्लम शेख हे आता ईडीच्या रडारवर आले आहे.

या प्रकरणाविषयी बोलताना, भाजपचे किरीट सोमय्या यांनी टिप्पणी केली , “मविआ सरकारमधील काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री अस्लम शेख हे सीआरझेड नो डेव्हलपमेंट झोनमध्ये समुद्र किनाऱ्यावर २ डझनहून अधिक फिल्म स्टुडिओंच्या अनधिकृत बांधकामात गुंतले होते. आम्ही संपूर्ण चौकशीची मागणी केली आहे.” अनधिकृत बांधकामांची एकूण किंमत ₹1000 कोटींहून अधिक असेल, असेही ते म्हणाले.

घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेख यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. त्यानंतर 300 कोटींच्या प्रकरणातील कागदपत्रे संबंधित एजन्सींना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर अवघ्या दोन दिवसांनी अस्लम शेख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी अस्लम शेख यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोजही उपस्थित होते. दोघेही एकाच गाडीतून फडणवीस यांना भेटायला गेले होते. याची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती.

कोण आहेत अस्लम शेख?

अस्लम शेख हे काँग्रेसचे मालाड पश्चिम मतदारसंघातील आमदार आहेत. शेख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय विभाग आणि बंदरे विकास मंत्री म्हणून काम पाहिले होते. तर 28 जुलै 2015 रोजी अस्लम शेख आणि इतर सहकाऱ्यांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना एक पत्र लिहून दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या शिक्षा माफीची मागणी केली होती.

Back to top button