'चालीसा अट्टाहास' फेम राणा दाम्पत्याला झटका ! जामीन रद्द का करू नये ? न्यायालयाची विचारणा
मुंबई; पुढारी ऑनलाईन : हनुमान चालीसा अट्टाहास फेम खासदार नवनीत राणा आणि आमदार नवनीत राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने नोटिस बजावली आहे. राज्य सरकारने राणा दाम्पत्याविरोधात जामीन रद्द करण्यात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे.
दरम्यान, न्यायालयाने बाजू मांडण्यासाठी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली असली, तरी जामीन रद्द करण्याबाबत कोणतेही वक्तव्य केलेलं नाही.
दरम्यान, सत्र न्यायालयाने नोटीस धाडताना आपल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये ? अशी विचारणा केली आहे. राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना माध्यमांशी बोलू नये, अशी अट घालण्यात आली होती. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांना आव्हानाची भाषा वापरली होती.
मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्याने सशर्त जामीन मंजूर करताना घालून देण्यात आलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. अजामीनपात्र वॉरंट त्यांच्याविरोधात जारी करावे, असे पोलीसांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे, निवडणूक लढवून दाखवा
लीलावती रुग्णालयातून रविवारी डिस्चार्ज मिळताच खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले. तुमच्यात दम असेल तर लोकांमधून निवडून येऊन दाखवा. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यात उभे राहतील तिथून मी उभी राहून जिंकून दाखवेन, तेव्हा त्यांना जनतेची ताकद काय असते हे कळेल, असे त्या म्हणाल्या.
दोन पिढ्यांपासून मुंबई महानगरपालिका शिवसेनेकडे आहे. मात्र, येणार्या निवडणुकीत मुंबईची जनता आणि रामभक्त त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईला न्याय देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने मुंबई पालिका निवडणुकीत उतरू आणि शिवसेनेविरुद्ध प्रचार करू, असेही त्यांनी जाहीर केले.
हनुमान चालिसाचे पठण करणे गुन्हा असेल तर मी 14 दिवस नाही, तर 14 वर्षेही तुरुंगात राहण्यास तयार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.
बीएमसीकडून नोटीस
रवी राणा मी आणि नवनीत राणा तुरुंगात असताना मला बीएमसी खारमधील आमच्या घरी वारंवार नोटीस देण्यात आल्या. ही इमारत ज्या बिल्डरने बांधली त्याला 15 वर्षांपूर्वी बीएमसीने परवानगी दिली होती. आता 15 वर्षांनी त्यांना हे बांधकाम बेकायदेशीर असल्याचे आठवले का? असा सवाल आमदार रवी राणा यांनी केला.
हे ही वाचलं का ?