मुंबई पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केलं : किरीट सोमय्या | पुढारी

मुंबई पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केलं : किरीट सोमय्या

मुंबई, पुढारी ऑनलाईन

“उद्धव ठाकरे यांचं सरकार हे माफिया सरकार आहे. मनसुख हिरेनची हत्याही ठाकरेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनीच केली. उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना आम्ही बघून घेऊ. काल ८० गुंडांनी माझ्या गाडीवर हल्ला केला. मुंबई पोलिसांनी मला गुंडांच्या हवाली केलं. ८ कमांडो होते म्हणून बचावलो. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंना एफआयआर बदलावा लागेल. माझ्यावरील हल्ल्याला पांडेच जबाबदार आहेत”, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, “आतापर्यंत ३ वेळा मारण्याचा प्रयत्न झाला. पण, महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे. भापजा महाराष्ट्राला घोटाळेमुक्त करणार. ठाकरे सरकारकडून माझ्यावरील हल्ल्याचा कट करण्यात आला. भाजपाचे शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन गृहसचिवांची भेट घेणार आहे. माझ्याऐवजी माझ्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात जाताना शिवीगाळ करण्यात आली”, असेही किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.

“ठाकरे सरकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे बाहेर काढले जाणार आहेत. विरोधकांना गाडण्याची भाषा ठाकरे सरकार करत आहे. उद्धव ठाकरेंकडून पोलीस विभागाचा गैरवापर केला जात आहे”, असही आरोप किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर केलेला आहे.

Back to top button