मुंबई : अकरावी प्रवेशाच्या चार नियमित फेर्यांनंतर शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या ‘ओपन टू ऑल’ फेरीसाठी राज्यभरातून 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 3 लाख 48 हजार 784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 8 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे.
इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आतापर्यंत 14 लाख 55 हजार 945 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 8 लाख 82 हजार 81 विद्यार्थ्यांनी चार फेर्यांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत. नियमित फेर्यानंतर शिक्षण संचालनालयाने 4 व 5 ऑगस्ट रोजी ‘ओपन टू ऑल’ या विशेष फेरीअंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे, भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे, पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरणे आणि प्राधान्य क्रम नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
4 व 5 ऑगस्ट या दोन दिवसांमध्ये 17 हजार 140 विद्यार्थ्यांनी नवीन नोंदणी केली. तसेच नियमित फेरीसाठी 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांनी प्राधानयक्रम भरले. तसेच व्यवस्थापन कोट्याअंतर्गत 22 हजार 855, अल्पसंख्यांक कोटयाअंतर्गत 8 हजार 431 इतक्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केले होते.
प्राधान्यक्रम भरून अर्ज अंतिम केलेल्या 3 लाख 81 हजार 420 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 48 हजार 784 विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशाची संधी मिळाली आहे. यामध्ये कला शाखेतील 96 हजार 3 विद्यार्थ्यांना, वाणिज्य शाखेसाठी 77 हजार 447 विद्यार्थ्यांना, विज्ञान शाखेसाठी 1 लाख 75 हजार 334 विद्यार्थ्यांना शाखानिहाय प्रवेशाची संधी मिळाली आहे.
प्रवेशाची संधी मिळालेल्या या विद्यार्थांना 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. राज्यातील इयत्ता अकरावीचे वर्ग 11 ऑगस्ट 2025 पूर्वी सुरु करणे आवश्यक आहे. तशा सूचना शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या राज्यातील 9 हजार 525 कनिष्ठ महाविद्यालये ही 11 ऑगस्टपूर्वी सुरू होणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ओपन टू ऑल’ची आकडेवारी
नोंदणी : 3,81,420
नवीन नोंदणी : 17,140
प्रवेश मिळालेले विद्यार्थी : 3,48,784
प्रवेश घेण्याची मुदत : 8 ऑगस्ट
महाविद्यालये : 9,525
आतापर्यंतचे प्रवेश : 8,82,081
प्रवेशाची अंतिम मुदत : 11 ऑगस्ट
शाखानिहाय प्रवेश मिळालेले विद्यार्थी
कला : 96,003
वाणिज्य : 77,447
विज्ञान : 1,75,334