राजेश टोपे : ‘मास्कमधून तूर्तास सुटका नाही, आयसीएमआरने मार्गदर्शन करावे’ | पुढारी

राजेश टोपे : 'मास्कमधून तूर्तास सुटका नाही, आयसीएमआरने मार्गदर्शन करावे'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोनाची रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. आताच्या घडीला तिसर्‍या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविल्यानंतर 50 टक्के रुग्णसंख्या घटल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ओमायक्रॉन या व्हेरियंटमुळे आलेली तिसरी लाट ओसरतेय असे म्हणता येईल, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी केला.

राज्यात तिसरी लाट सुरू होऊन आता 40 दिवस उलटले आहेत. तिसर्‍या लाटेदरम्यान एका दिवसात राज्यात सर्वाधिक 47 हजारांइतकी रुग्णसंख्या आढळली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर भागातील रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. दुसरीकडे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे; पण रुग्णसंख्यावाढीचा दर सामान्य आहे. मुंबईनंतर पुण्यात रुग्णसंख्या वाढली होती. तेथेही आता 50 टक्के इतकी घट दिसत आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातील दोन शहरांतील परिस्थिती एकदम समाधानकारक स्थितीत आल्याने राज्यातील तिसरी लाट ओसरू लागल्याचे मानले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच टोपे यांच्या वक्‍तव्याकडे पाहिले जात आहे.

राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत चालली आहे. 45 ते 50 हजार रुग्ण प्रतिदिन सापडल्यानंतर आता सरासरी दैनंदिन 25 हजार इतके रुग्ण आढळून येत आहेत. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथे रुग्णवाढीचा दर कमालीचा घटला आहे. दुसरीकडे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसह ग्रामीण भागात रुग्ण वाढत आहेत. मात्र, तेथे चिंतेचे कारण दिसत नाही. राज्यात आजच्या घडीला अडीच लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण असले, तरी बहुतांश रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. राज्यातील रुग्णालयांतील उपलब्ध बेडच्या केवळ 7 टक्के बेडवरच रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन आणि आयसीयूमध्ये एक टक्क्याच्या आसपास रुग्ण आहेत.

मास्कमधून तूर्तास सुटका नाही

महाराष्ट्राची मास्कमधून एवढ्यात सुटका होणार नाही, असे टोपे यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात मास्कमुक्‍तीचा कोणताही विचार नाही. मास्क न वापरण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला असला, तरी तो कोणत्या आधारावर घेण्यात आला याची माहिती घेतली जात आहे. पाश्‍चिमात्त्य देशांनी कोरोनासोबत जगण्याचा मार्ग स्वीकारला आहे. त्याबाबतचा अभ्यास करण्याबाबत चर्चा करण्यात आली. ‘आयसीएमआर’ने याविषयी मार्गदर्शन करावे, अशी आमची अपेक्षा आहे. यासाठी राज्य शासन ‘आयसीएमआर’ला पत्र लिहिणार आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

Back to top button