

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: पूर्णा शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्णा नदी पात्रात कोल्हापुरी बंधाऱ्यात मंगळवारी (दि.४) सिध्देश्वर धरणातून १८०० ते २००० क्युसेक क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. तरी नदीकाठ परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच नदीपात्रात कोणीही उतरु नये, असे आवाहन पूर्णा पाटबंधारे विभागाचे वसमतनगर येथील कार्यकारी अभियंता सं .बा. बिराजदार आणि पूर्णा पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी केले आहे. (Parbhani News)
दरम्यान, मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा करणारी नळयोजना पूर्णा नदीपात्रातील पाणी आटल्यामुळे बंद पडली होती. त्यामुळे शहर वासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. या समस्ये विषयी "दै.पुढारी"ने दि. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी च्या अंकात "पूर्णा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधारा कोरडाठाक "या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची पालिका प्रशासनाने दखल घेतली.
सिध्देश्वर धरणातील पाणी पूर्णा नदीपात्रात सोडून कोल्हापुरी बंधा-यात आणण्याची केलेली मागणी लावून धरली होती. आता धरणाचे पाणी पूर्णा नदीपात्रात उच्च दाबाने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी टंचाईतून दिलासा मिळणार आहे.