

परभणी/झरी : कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने घरी परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा कार–दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१०) पहाटेच्या सुमारास झरी गावाजवळ घडली. या घटनेमुळे जिंतूर तालुक्यातील बोर्डी व मुडा परिसरात शोककळा पसरली आहे.
हभप.माऊली दिगंबरराव कदम (वय ३०), हभप. प्रसादराव कदम (वय ४५, दोघे रा.बोर्डी, ता.जिंतूर) आणि हभप.दत्ता माणिकराव कऱ्हाळे (वय ३०, रा.मुडा, ता.जिंतूर) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत. ते तिघेही परभणी तालुक्यातील पिंपळा येथे आयोजित कीर्तन सोहळ्यासाठी गेलेले होते.
शनिवारी (दि.१०) पहाटे १ वाजेच्या सुमारास कीर्तन कार्यक्रम आटोपून ते दुचाकीने परभणी–जिंतूर मार्गे बोर्डी गावाकडे निघाले होते. झरी गावाजवळील लोअर दुधनाच्या डाव्या कालव्याजवळ त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने आलेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्यातील जमादार शंकर हाके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिघांनाही मृत घोषित केले.
अपघाताची माहिती कळताच बोर्डी व मुडा परिसरात शोककळा पसरली आहे. कीर्तन, अध्यात्मिक कार्यात सक्रिय असलेल्या तरुण वारकऱ्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे.