

Purna taluka unseasonal rain
पूर्णा : तालुक्यातील पांगरा गावच्या शिवारात सोमवारी (दि. ३०) रात्री ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानक चक्रीवादळासारखे वादळी वारे वाहत हलक्या स्वरूपाची गारपीट झाली. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात आंबा पिकाचे नुकसान झाले.
बांधावरील गावरान झाडांना लागलेली आंब्याची फळे वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात गळून पडली. तसेच शेतकरी बाबाराव ढोणे यांच्या बागेतील सुमारे १०० केशर आंब्याची झाडे वाऱ्याच्या तडाख्यात मोडून पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती कृषी अधिकारी व तलाठी यांना देऊनही पंचनामा करण्यासाठी कोणीही आले नसल्याची खंत संबंधित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, तालुक्यातील बानेगाव, पेनूर, सातेफळ आणि टाकळी परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडून शेती पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी विजेचे खांबही वाकले आहेत.
अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनेक ठिकाणी झाडाखाली गळून पडलेल्या आंब्यांचा सडा पाहायला मिळाला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.