जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलन करण्यात येत आहेत. पाचेगाव, मानधानी, रेपा, भोगाव, पुंगळा गावातील सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल १६ किलोमीटर पायी चालत अनोखे अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन आज (दि.३) तहसिलदार यांना देण्यात आले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात विविध आंदोलन करण्यात येत आहेत. दरम्यान, राज्य सरकारने उपोषणकर्ते मनोज जरांगे- पाटील यांच्याकडे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला आहे. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, साखळी उपोषण ,नेत्यांना गावबंदी कायम ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रवगातून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात यावी. आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घर बांधून द्यावे, अशी मागणी करण्यात आली.