

मानवत : मानवत शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात शुक्रवारी ता 12 रात्री 10 च्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने दाणादाण उडवली. शेतातील आखाड्यासह घरावरील पत्रे तसेच सोलर प्लॅन्ट उडाल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
शुक्रवारी दिवसभर प्रचंड ऊन असल्याने उकाडा होता. रात्री 10 च्या सुमारास अचानकपणे वादळ वारे सुरू होऊन त्यानंतर लगेचच पावसास सुरुवात झाली. वादळ वारे मोठ्या प्रमाणात असल्याने विजेचे तारा तुटून पडल्याने शहरासह ग्रामीण भागाची वीज पूर्णता खंडित झाली. मानवत रोड भागात यशवाडी ते कोल्हावाडी दरम्यान रस्त्यावरील विजेचे 15 ते 20 पोल मोडून खाली पडले. मानवत शहरासह सोमठाणा, लोहरा, भोसा, सारंगापूर, पोहंडूळ, कुंभारी तांडा, मंगरूळ पालम पट, करंजी, रुढी, केकरजवळा किनोळा बुद्रुक, सोनुळा या गावातील शेत आखाड्यावरील तसेच अनेक उडून गेले.
शेतात असलेले अनेक सोलर प्लांट चे नुकसान झाले. या वादळ वाऱ्यात अनेक झाडे उन्मळून पडली. मानवत शहरातील तलाब कट्टा परिसरातील विजेची मुख्य तार तुटल्याने दोन तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तर ग्रामीण भागात अनेक गावांना सकाळपर्यंत अंधारात राहावे लागले.