

Sanjay Gandhi Niradhar Yojana Non-Government Committee Stay
मानवत : मानवत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय समितीच्या नियुक्त्या वादग्रस्त ठरल्या असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्या तात्काळ स्थगित केल्या आहेत. नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी ही समिती गठित केली होती. समितीच्या अध्यक्षपदी बालाजी कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती, तर सदस्य म्हणून अनंत भदर्गे, प्रमिला चव्हाण, शितल कुऱ्हाडे, अॅड. विक्रमसिंह दहे, शिवाजी पाटील, कीर्ती कत्रूवार, चंचल कीर्तने, शैलेंद्र कत्रूवार आणि दिनकर कोक्कर यांचा समावेश होता. या सर्वांमध्ये शिवसेना व भारतीय जनता पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांचा मोठा वाटा होता.
दरम्यान, मानवत शहर पाथरी विधानसभा मतदारसंघात येत असून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर करतात. समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही कार्यकर्त्याला स्थान न दिल्यामुळे नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा आहे. आमदार विटेकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचेही बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी समितीच्या नियुक्ती आदेशाला प्रशासकीय कारणास्तव पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याचे स्पष्ट केले आहे.