

Jintur Farmer End Life
चारठाणा : जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा शिवारात नापिकी आणि बँकेच्या कर्जफेडीच्या विवंचनेतून ६५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.२८) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव सुदाम यादा ढवळे (वय ६५, रा. सावरगाव, ता. जिंतूर) असे आहे. ते सोमवारी (दि. २७ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरातून शेताकडे गेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान सावरगाव तांडा शिवारातील गट क्रमांक १९ मधील त्यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
याप्रकरणी मृताचे पुत्र सुरेश सुदाम ढवळे (वय ३९) यांनी चारठाणा पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदाम ढवळे हे गेल्या काही दिवसांपासून सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत होते. कर्जाची परतफेड कशी करावी, याची त्यांना सतत चिंता होती. तसेच शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पहिल्या यादीत आपले नाव नसल्याने त्यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच चारठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.