

मानवत : शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यासह त्याच्या मुलाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मानवत तालुक्यातील रत्नापूर येथे सोमवारी (दि.३०) सायंकाळी ८ च्या सुमारास घडली. याप्रकरणी अच्युतराव भिमराव चाळक ( रा. रत्नापूर, ता. मानवत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मानवत पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास रत्नापूर येथील शेतगट क्रमांक १२३ मध्ये ही घटना घडली. याबाबत फिर्याद अच्युतराव भिमराव चाळक ( रा. रत्नापूर, ता. मानवत) यांनी दिली आहे.
फिर्यादी व आरोपी यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद सुरू होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी अच्युत चाळक व त्यांचा मुलगा गजेंद्र हे रत्नापूर येथील आपल्या शेतात असताना आरोपी बाबासाहेब सुखदेव चिलवंत व प्रशांत आबासाहेब चिलवंत हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत वाद घालत फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीच्या मुलालाही मारहाण करण्यात आली. तसेच संशयितांनी “तुमचे घरदार संपवून टाकू” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर चाळक यांनी मानवत पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी मानवत पोलिस ठाण्यात बाबासाहेब चिलवंत व प्रशांत चिलवंत या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.