

पूर्णा : सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी चक्क मृतांच्या आणि भूमीहीनांच्या नावावर कर्ज उचलून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार पूर्णा तालुक्यातील देऊळगाव (दु.) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत उघडकीस आला आहे. या बोगस कर्जवाटप प्रकरणाचा पर्दाफाश रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी केला असून, त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करत फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.
संस्थेने एकूण 64 शेतकऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तहसीलदारांकडून प्राप्त अधिकृत पत्रात यापैकी 43 लाभार्थी शेतकरी पूर्णपणे भूमीहीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांच्या नावावर गुंठाभरही जमीन नाही, अशांच्या नावावर कृषी कर्ज दाखवून शासकीय तिजोरीवर डल्ला मारण्यात आला आहे.
केवळ 26 आर (गुंठे) सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 ते 3 लाख रुपयांचे कर्ज खिरापतीसारखे वाटण्यात आले. काहींनी एकाच बँकेत दोन-तीन खाती उघडून प्रत्येक खात्यावर स्वतंत्रपणे कर्ज उचलले. तसेच, कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या शेतकऱ्यांच्या बनावट सह्या करून त्यांच्या नावावर परस्पर लाखो रुपये लाटण्यात आले. या सर्व प्रकारात संस्थेच्या चेअरमन आणि संचालक मंडळाचे संगनमत असल्याचा आरोप आ. गुट्टे यांनी केला आहे.
या गैरव्यवहारामुळे सहकार चळवळीची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. त्यामुळे सदर संस्था तत्काळ बरखास्त करावी आणि चेअरमनसह दोषी संचालक मंडळावर फसवणुकीचे फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी जिल्हा उपनिबंधक, जिल्हा बँक व्यवस्थापक आणि सहायक निबंधकांकडे केली आहे. आता प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
घोटाळ्याची ठळक वैशिष्ट्ये
भूमीहीनांना कर्ज : 43 जणांकडे जमीन नसतानाही कृषी कर्ज.
मृतांच्या नावे कर्ज : मृत्यूनंतर 2-3 वर्षांनी त्यांच्या नावावर उचलले पैसे.
बोगस सह्या : परगावी असणाऱ्यांच्या खोट्या सह्या करून फसवणूक.
नियमबाह्य वाटप : 26 गुंठे जमीनधारकाला 3 लाखांचे कर्ज.
मृतांच्या आत्म्यालाही कर्जाचा बोजा
प्रकरण 1 : राम देवराव दुधाटे यांचे 2022 मध्ये निधन झाले असताना, त्यांच्या नावावर 2025 मध्ये कर्ज उचलण्यात आले.
प्रकरण 2 : प्रल्हाद माधव दुधाटे यांचे 2021 मध्ये निधन झाले, तरीही त्यांच्या नावावर 2023 मध्ये कर्ज मंजूर करण्यात आले.
मृत व्यक्ती बँकेत येऊन सही करू शकत नाहीत, तरीही त्यांच्या नावावर कर्ज उचलून हे पैसे नक्की कुणाच्या खिशात गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.