

MP Ashok Chavan inspected the damage agriculture unseasonal rains
अर्धापूर, पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा हाती आलेली केळी, पपई व फळबागांचे नुकसान झाले आहे. भोकर मतदार संघातील अर्धापूर व मुदखेड या परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. अशा कठीण परिस्थितीत त्वरित मदत मिळावी म्हणून मी जिल्हाधिकारी व राज्याचे महसूलमंत्री यांच्याशी तातडीने बोललो असून, लवकरच शासनास अहवाल सादर झाल्यास महाराष्ट्र सरकारकडून भरीव मदत करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. तुम्ही चिंता करू नका, असे आश्वासन खा. अशोक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिले.
खा. अशोक चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी गुरुवारी (दि.१२) अर्धापूर तालुक्यातील उमरी, कोंढा, अर्धापूर, पांगरी, लोण खुर्द, बुद्रुक, लहान, आंबेगाव आदी गावांना थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार रेणुकादास देवणीकर, तालुका कृषी अधिकारी विशाल विहऱ्हाडे, संजय देवकांबळे, विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी पंकज देशमुख यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, गोविंदराव शिंदे नागेलीकर, बी. आर. कदम, सभापती संजय देशमुख लहानकर, प्रभारी किशोर स्वामी, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, दत्ता पाटील पांगरीकर, नगराध्यक्ष प्रवीण देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तदरखान पठाण आदी होते.
नुकसानीची पाहणी करून खा. अशोक चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांनी प्रशासनाला ड्रोनच्या साह्याने तातडीने पंचनामे करून शासनास लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.