

MLA Rahul Patil: We must demonstrate our strength by remaining united
परभणी, पुढारी वृत्तसेवा : कार्यकर्त्यांचा पक्ष असलेली शिवसेना सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. शिवसेनेने रस्त्यावरच्या अनेक लोकांना मोठा केले. ते लोक निघून जात आहेत. कुणी कुठे गेले तरी शिवसेनेला आणि सामान्य शिवसैनिकाला काही फरक पडणार नाही, आपण एकसंघ राहून उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं, आपण आपली ताकद दाखवून द्यायची असा निर्धार आ. पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शनिवारी परभणीत मुक्कामी येणार आहेत. दि.२८ जून रोजी अक्षदा मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. यानिमित्त रविवारी (दि.२१) आ. डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जालना जिल्हाप्रमुख महेश नळगे, ज्येष्ठ नेते कल्याणराव रेंगे आदीसह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आ. डॉ. पाटील म्हणाले, ज्या व्यक्तीला दोनदा आमदार, तीनदा खासदार केले. तो व्यक्ती पक्षाशी पैशासाठी गद्दारी करत आहे. असे कितीही लोक आले गेले याचा शिवसेनेला काही फरक पडणार नाही.
आपण सर्वांनी एक राहुयात इतर पक्षाकडून आपल्या कार्यकर्त्याला कोणी दाब देण्याचा प्रयत्न करत असेल तर गाठ माझ्याशी आहे. कुणीही घाबरायचं नाही. मी तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला. उद्धव ठाकरे यांचे आपल्याला जंगी स्वागत करायचे आहे. उद्धव ठाकरे हे मेळाव्यात आपल्याला जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढील दिशा ठरवू, मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांच्या समवेत हा बालेकिल्ला अभेद आहे हे दाखवून देऊ, असे आ. डॉ. पाटील म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत आपलाच विजय होणार असून विधान परिषदेची निवडणूक आपण मोठ्या ताकतीने लढलो आहोत. पुरेसे मतांचे बळ नसतानाही न रडता न थांबता आपण स्वाभिमानाने निवडणूक लढवली. या निवडणुकीत सत्ताधारी मंत्र्यांकडून आपल्या उमेदवाराला थेट ५० कोटींची ऑफर आली होती. परंतु त्यांनी त्यांची निष्ठा ठाकरे कुटुंबावर दाखवून दिली कोणी कितीही बॅनरबाजी करू द्या, विजय आपलाच आहे, असा विश्वास आ. डॉ. पाटील यांनी व्यक्त केला.