

Marathwada Floods : मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीपात्रात आलेल्या बॅक वॉटरमुळे गंगाखेड तालुक्यात महाप्रलय ओढवला असून सुनेगांव –सायाळा जवळील 400 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे व जायकवाडी, माजलगाव धरणातून गोदावरीत तब्बल चार लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून त्याचा फटका गंगाखेड तालुक्याला बसला आहे. मासोळी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धारखेड पुलावरून पाणी वाहत असल्याने 35 गावांचा संपर्क तुटला आहे. सुनेगाव येथील 56 कुटुंब, धारासुर येथील 60 कुटुंब तसेच गंगाखेड शहरातील बरकत नगरमधील अनेक कुटुंबांना मिळून तब्बल 150 वर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बरकत नगर भागात घरामध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
तालुक्यातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. पाणी ओसरल्यानंतरच प्रशासन पंचनामे करून खरी नुकसानाची आकडेवारी जाहीर करणार असले तरीही प्रशासनाने गंगाखेड तालुका दुष्काळ यादीतून वगळला असताना प्रत्यक्षात मात्र या महाप्रलयाची परिस्थिती भयंकर दिसून येते आहे. दरम्यान, गंगाखेड शहरातूनच नदीपात्र ओसंडून वाहत असताना देखील शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नगरपालिकेच्या प्रशासनक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.