

Eknath Shinde: Will keep the promise of loan waiver
परभणी, पुढारी वृत्तसेवा राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकऱ्यांचा आहे. तो आपला अन्नदाता आहे. मायबाप आहे. कर्जमाफीचा त्यांना दिलेला शब्द पाळणारच असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि.१२) परभणी येथे आयोजित संवाद दौऱ्यादरम्यान दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्यावतीने जिंतूर रोडवरील महात्मा फुले हायस्कूलच्या मैदानावर बुधवारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या ज्योतीताई वाघमारे, माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. हरिभाऊ लहाने, राजू कापसे पाटील, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम व मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अतिवृष्टीच्या काळात सरकार व शिवसेना यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. शेतकऱ्यांकडे नुसते हात हलवत गेलो नाही तर, मदत घेऊन गेलो आहोत.
विरोधक बिस्कीटचा एखादा पुडा घेऊन तरी आले का? असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता यावेळी लगावला. दगाबाज कोण आहे हे जनता चांगली ओळखत आहे, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना कोणी बांधली? असा सवालही उपस्थित करत ज्यांनी १०५ जागा लढविल्या, त्यांना केवळ २० जागा जिंकता आल्या. आम्ही ८० जागा लढवत ६० जागा निवडून आणल्या आहेत, यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न निकालात निघाल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
फेसबुक लाईव्ह नाही तर लोकांशी फेस टू फेस बोलावे लागते
फेसबुक लाईव्हवरून सरकार चालवता येत नाही, त्यासाठी लोकांशी फेस टू फेस बोलावे लागते, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यात माझ्याकडे कुणाला द्यायला सध्या काही नाही असे विधान शेतकऱ्यांच्या संदर्भात केले होते. याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जेव्हा तुमच्याकडे होते, तेव्हा काय दिले असा सवालही उपस्थित केला.