Purna Taluka Heavy Rain | 'आता जगावं कसं'? पूर्णा तालुक्यात ढगफुटीने उभी पिकं उपटली; शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

Parbhani Rain | लिमला, ताडकळस, वझूर महसूल मंडळात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी
Purna Taluka crop damage
शेतशिवारातील हळद, कापूस, ऊस, सोयाबीन, तूर, मुग, उडिद पिके भुईसपाट झाली आहेत.Pudhari Photo
Published on
Updated on

Purna Taluka crop damage  cloudburst heavy rainfall

आनंद ढोणे

पूर्णा: तालुक्यातील लिमला, ताडकळस, वझूर महसूल मंडळात गुरूवारी (दि. १४) मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. मुसळधार पावसामुळे शेतशिवारातील हळद, कापूस, ऊस, सोयाबीन, तूर, मुग, उडिद ही पिके अक्षरशः गाळमातीसह उपटून वाहून गेली. नदीकाठच्या दोन्ही बाजूंची पिकं कुठं वाहून गेली, तर कुठे पाण्याखाली जाऊन पूर्णपणे बाधित झाली. सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना होत्याचं नव्हतं झालेलं भयाण वास्तव दिसलं. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले "आता जगायचं कसं?" असा प्रश्न त्यांच्या मनात घर करून राहिला आहे.

या ढगफुटीमुळे माहेर, बानेगाव, धानोरा काळे, माखणी, फुलकळस, लिमला आदी गावांमध्ये एकच हाहाकार माजला. रात्री एक-दिड वाजता सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू राहिला. चार तासांच्या मुसळधार पावसाने नदीनाले ओसंडून वाहू लागले. शेतातील पिके, चारा, वैरणीच्या सुड्या वाहून गेल्या. काही ठिकाणी पशुधनही वाहून गेल्याची माहिती आहे. दोन दिवसांपासून अनेक शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटलेली नाही. लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याने कुटुंबातील सदस्यांनाही दोन घास जात नाहीत. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता, निराशा आणि असहायतेचं सावट स्पष्ट दिसत आहे.

Purna Taluka crop damage
Parbhani Rain | परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझीम

शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या

या नैसर्गिक आपत्तीतून सावरायचं कसं, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे निकष बदलल्याने ढगफुटी, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरपाई मिळेल का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अनेक शेतकऱ्यांचे दावे रिजेक्ट होत असल्याची तक्रार आहे. सरकारकडून मदतीची अपेक्षा असली, तरी ती किती आणि केव्हा मिळेल, याबाबत अनिश्चितता आहे. "देवानं दिलेलं सरनां अन् माणसानं देलेलं पुरनां," असं म्हणत शेतकरी मनस्वी पुटपुटत आहेत. अजूनही पाऊस सुरू असल्याने आणखी आपत्ती ओढावेल की, या भीतीने शेतकरी औटघटका मोजत आहेत.

शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटणार

या आपत्तीत शेतकऱ्यांचे फक्त पिकांचेच नव्हे, तर कुटुंबाच्या जगण्यावरचं संकट गडद झालं आहे. वर्षभराचा सणवार, घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा?, या चिंता शेतकऱ्यांच्या मनात खोलवर घर करून राहिल्या आहेत. निसर्गाच्या या कोपामुळे शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news