पेठपिंपळगाव : चाटोरी (ता. पालम) येथे शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बेकायदेशीरपणे कत्तल करण्यासाठी घेवून जाणारे बैल पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेवून पोलिसांनी तीन आयशर वाहने जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे.
चाटोरी बिटातंर्गत तीन वाहनांमध्ये कत्तलीसाठी ५० बैल घेवून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी या मार्गावर गस्त वाढवुन वाहनांची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी ३ आयशर वाहनांमध्ये प्रत्येकी १८, १५ व १६ असे एकूण ५० बैल असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांनी तिन्ही वाहने व आठ जणांना ताब्यात घेतले.
यामध्ये शेख कलीम शेख युसूफ, अखील खान, शब्बीर खान, शेख रहीम शेख सुकूर, मुबारक शाह वजीर शाह, वसीम मुस्तफा शेख, अरबाज महेबुब कुरेश, रज्जाक तडवी व नासेर नजीर शेख या आठ जणांचा समावेश आहे. हे सर्व आरोपी जळगाव व संभाजीनगर जिल्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक सुरेश थोरात यांनी बैलाची रवानगी गोशाळेत केली.