

परभणी : जातनिहाय जनगणनेचा वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध नसताना आंबेडकरी समूहाला लक्ष करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे. या उपवर्गीकरणाला ५८ जातींचा प्रखर विरोध असून राज्य शासन मनमानी करत आहे. या निर्णयाच्या विरोधात बुधवारी (दि.१७) आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शनिवार बाजार मैदानापासून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. क्रांती चौक, गांधीपार्क, अष्टभुजादेवी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून आंदोलन मैदानावर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी भदन्त डॉ. उपगुप्त महास्थवीर, भदन्त मुदीतानंद थेरो, भदन्त पयावंश, भदन्त मोग्गलायन, भदन्त संघमित्र, आदींसह आरक्षण उपवर्गीकरण विरोधी धडकमोर्चा समितीचे पदाधिकारी आणि अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रमुख नेते उपस्थित होते.
प्रारंभी विश्वजीत वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांनी न्या. बदर समिती अहवाल रद्द करा, पदोन्नतीतील आरक्षण मिळालेच पाहिजे, खासगी क्षेत्रात आरक्षण सूत्र लागू करा, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोनि. अशोक घोरबांड व इतर दोषी पोलिस अधिकारी, कर्मचार्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, यासह आंबेडकरी समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.
मनुवाद्यांचे षडयंत्र ओळखा : आनंदराज आंबेडकर
मातंग समाज वाईट नाही, ते आपले भाऊच आहेत. ५८ जात समूहाचे म्हणणे आम्हाला हे उपवर्गीकरण नको, पण सरकार मुद्दाम दोन जातीमध्ये तेढ निर्माण करू पाहत आहे. कारण त्यांना इतर समाजामध्ये इंटरेस्ट नाही पण बौध्द समाज ज्या पद्धतीने प्रगती करतोय, ते अनेकांना सहन होत नाही. मनुवादी सरकार जाणीवपूर्वक उपवर्गीकरणाचा निर्णय घेत आहे. ते त्यांनाही माहीत आहे की, न्यायालयात टिकणार नाही. केवळ मातंग समाजाला राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र मातंग समाजाने हे षडयंत्र लक्षात घेतले पाहिजे.
उपवर्गीकरणाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ते वेळीच लक्षात घेतले पाहिजे. मागच्या सर्व पिढ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले. आज त्याचा परिणाम म्हणून आपल्या सर्वांना आरक्षण मिळालं, आज आपण स्वाभिमानाने जगतोय, पुढच्या पिढीचा विचार करून सर्व अनुसूचित जातींनी हा निर्णय हाणून पाडला पाहिजे, असे प्रतिपादन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. ३० जून रोजी मुंबईत होणार्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.