Parbhani rain update: आहेरवाडी वडगावला पुराचा वेढा दोन्ही गावचा तुटला संपर्क, नदीकाठची पीके पूर्णपणे पाण्याखाली
पूर्णा : तालुका परिसरात मागील दोन दिवसांपासून पडणा-या जोरदार पावसामुळे नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. संततधार कोसळणाऱ्या पावसाने आहेरवाडी-वडगाव या गावाशेजारी असलेल्या नदीला मोठा पूर आला आहे. पुराच्या पाण्याने अक्षरशः गावाला वेढा दिला असून, हे पुराचे पाणी गावात घुसले आहे. त्यामुळे नदीकाठची दोन्ही बाजूंची पीके पाण्याखाली गेली आहेत.
या पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका बागायती व खरीप पिकांना बसला आहे. शनिवारपासून आलेला नदीला पूर अजूनही कायम आहे. शेतातून गावात येणारे दोन्ही रस्ते नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे बंद झाले आहेत. या दोन्ही गावचा संपर्क दोन दिवसापासून तुटला आहे. गावाशेजारील तीनही नद्या पुराच्या पाण्याने दुथडी भरुन वाहत आहेत.
आहेरवाडी गावाजवळील प्रमुख जिल्हा मार्ग १० या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम करण्याची निवीदा मंजूर असताना सबंधीत कंत्राटदाराने पुलाचे बांधकाम केले नाही. त्यामुळे येथील नदीवर अधिक उंचीचा पुल नसल्यामुळे गावचा संपर्क तुटल्या गेला. शेतात पाणी घुसल्याने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधीत पीक क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी सरपंच ऋषी मोरे,मा.पं स सदस्य छगनराव मोरे, सोपान मोरे सह ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हाधिकारी गावडे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त शिवाराची पाहणी
पूर्णा तालुक्यातील लिमला, ताडकळस, वझूर सर्कल मध्ये १४ आगस्ट रोजी रात्री ढगफुटीसदृष्य अतिवृष्टी झाली होती. यात लिमला,बानेगाव,माहेर, धानोरा काळे,फुलकळस, देवूळगाव दुधाटे आदी गाव शिवारातील बागायती खरडून गेली. त्या भागाची चिखल पाण्यात जायमोक्यावर जावून १७ आगस्ट रोजी रविवार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपविअ डॉ. जिवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर, तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव, कृषी सहाय्यक,मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या समवेत बाधीत शेतकऱ्या समक्ष पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी महसूल व कृषी अधिका-यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

