जिंतूर ; पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील येलदरी धरणातून चौघांनी संगमत करत 40 किलो कोळंबी (झिंगा) चोरून नेला. या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या विषयी सविस्तर माहिती अशी की, येलदरी जलाशयात विविध प्रकारच्या माश्यांचे प्रकार मुबलक प्रमाणात आहेत. मरळ, कथला, मिरगल, वांबट आदी विशेषतः कोळंबी (झिंगा) यास जास्त दर व मागणी मोठ्या प्रमाणात असते. कारण येलदरी धरणातील झिंगा हा गोड्या पाण्यातील असल्याने या कोळंबीस देशासह विदेशात सुद्धा मागणी आहे.
येलदरी धरणातून विनापरवाना बत्तीस हजार रुपये किमतीची कोळंबी झिंगा पकडून ते बाजारात विकण्याच्या तयारीसाठी असताना एका ठिकाणी सदरील हा झिंगा ठेवल्याचे धरणाच्या सुरक्षा रक्षकाला समजले. त्यांनी ते पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत संस्थेच्या अध्यक्षांच्या तक्रारीवरून दोघांवर बामणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.
संस्था अध्यक्ष माबुद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार असे नमूद केले आहे की, सुरक्षा रक्षक विकास सुभाषराव देशमुख व संतोष भीमराव पाईकराव या दोघांना गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे वसंत लिंबाजी बनग्या राहणार (सावंगी) याने त्याच्या व इतर साथीदारासह संगनमताने येलदरी धरणातून विनापरवाना कोळंबी (झिंगा) पकडून तो धरणा शेजारील आखाड्यातील झोपडीत ठेवण्यात आला होता. या विषयी माहिती मिळताच त्या आधारे दोघा सुरक्षा रक्षकांनी वसंत बनग्या यांच्या आखाड्यावरील झोपडीत जाउन पाहिले असता, त्यांना एका पिशवीत तब्बल 40 किलो झिंगे ठेवल्याचे आढळून आले.
सुरक्षारक्षकांना पाहताच जागेवरून तीनजण पळून गेले. सुरक्षारक्षकांनी वसंत बनग्या यास पकडून संस्थेचे अध्यक्ष अ.माबूद यांच्याकडे त्यांना आणले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, हिरामण मोहन अहिरे यांच्या सांगण्यावरून त्याने व कृष्णा बनग्या अनिल चुंबळे यांनी मिळून येलदरी धरणातील झिंगे चोरलेले आहेत. हे झिंगे हिरामण मोहन लाहिरे यास विकणार असल्याचा खुलासाही त्यांनी संस्था अध्यक्षांजवळ केला. या घटनेचा पुढील तपास बाम्हणी पोलीस करत आहेत.
हेही वाचा :