

Women Turn Aggressive Over Water Crisis; March on Gram Panchayat
बिलोली, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दशकांपासून कासराळी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता असूनही गावातील काही ठराविक वॉर्डात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे लागत असल्याच्या मुद्द्यावरून येथील वॉर्ड क्रमांक १ मधील संतप्त झालेल्या महिलांनी दि.४ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. तसेच यावेळी महिलांनी प्रशासनासह सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला.
मोर्चादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आर-ोप केले आहेत. गावात सूडबुद्धीने राजकारण केले जात असून, जे नागरिक त्यांच्या विचारांचे नाहीत किंवा त्यांच्या विरोधात बोलतात, अशांच्या भागात जाणूनबुजून सुविधा रोखल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच सत्त्-ोचा वापर लोकहितापेक्षा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी होत असल्याची भावना आंदोलक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाण्याची टंचाई अधिकच भीषण झाली असून येथील महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
एकीकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या विकासकामांच्या गप्पा मारल्या जात असताना, स्वतः च्या गावात मात्र साध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकलेला नाही. वॉर्ड क्रमांक १ मध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे.
प्रशासन आता तरी लक्ष देणार का ? नागरिकांना मूलभूत गरजांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या घागर मोर्चानंतर तरी प्रशासन या समस्यांकडे लक्ष देणार की सूडबुद्धीचे हे राजकारण असेच सुरू राहणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.