

Wedding ceremony assistance scheme MLA Rajesh Pawar
नांदेड, पुढारी वृत्तसेवा
आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलींचे लग्न राहू नयेत, किंवा त्यांना गैरवाजवी तडजोड करावी लागू नये. यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार स्वयंप्रेरणेने पुढे आले आहेत. वधू-पित्याच्या डोक्यावरील मुलीच्या लग्नाचे ओझे हलके करण्याचा संकल्प त्यांनी केला असून एक चांगली योजना जाहीर केली आहे. सप्तपदीसाठी माझा हातभार... एक भाऊ म्हणून छोटासा प्रयत्न, हे ब्रीद घेऊन त्यांनी जाहीर केलेली विवाह सोहळा मदत योजना महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे.
आ. राजेश पवार हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. पहिल्या प्रयत्नात त्यांनी सार्वजनिक हिताचे अनेक उपक्रम राबवले होते. यावेळी त्याबरोबरच ते वैयक्तिक लाभाच्या योजनांवर अधिक फोकस करताना दिसून येतात. प्रशासकीय यंत्रणेवर ओरडून नव्हे तर त्यांना आपलेसे करत चौकटीच्या बाहेर जाऊन काम करण्यावर त्यांचा भर दिसून येतो आहे. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान घरकुल योजन-'चा लाभ मतदार संघातील अधिकाधिक लोकांना मिळवून देण्यासाठी ग्रामसेवकांच्या माध्यमातून अनुकरणीय प्रयत्न केला.
आता त्यांनी अलीकडे राज्य व देशात घडलेल्या काही घटनांतून बोध घेत उपवर मुलींसाठी किंबहुना त्यांच्या पित्याचे ओझे हलके करण्याची एक योजना जाहीर केली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य विषद करताना ते म्हणाले, चिंता मिटली नवरी सजली असे आमच्या नव्या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. ग्रामीण किंवा शहरी सुद्धा भागात अनेक लग्नाचे वय झालेल्या मुलींच्या पित्याला लग्नाचा खर्च कसा करावा, याची चिंता सतावते. लोक काय म्हणतील, गणगोत काय म्हणेल, या भीतीपोटी ऐपत नसतानाही कर्ज काढून लग्न थाटामाटात केले जाते. त्यानंतर या कर्जाखाली संबंधित कुटुंब दवून जाते. ते कधीच वर येऊ शकत नाही.
एकतर पैसे नाहीत म्हणून मुलींचे लग्न राहू नयेत किंवा मुलीसाठी योग्य नसलेला मुलगा नवरा म्हणून निवडायची वाईट वेळ मुलीच्या बापावर येऊ नये, एवढाच प्रामाणिक उद्देश आमच्या या योजनेमागे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी सामाजिक जाणिवेतून आम्ही ही योजना राबवत आहोत. यातून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन मिळावे, असाही प्रयत्न आहे. त्यामुळेच ४ ते ६ लग्न एका मंडपाखाली लागणार असतील तर मंडप, भांडी किंवा जेवण यापैकी एकाचा संपूर्ण खर्च माझ्या खिशातून करणार आहे. ७ ते १२ लग्न एकत्र असतील तर मंडप व जेवण या दोन्हींचा संपूर्ण खर्च मी स्वतः करणार आहे, असे आ. पवार म्हणाले.
आ. राजेश पवार यांनी समाजातील अतिशय गरीब व कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबासाठी लागू केलेली ही योजना आगामी लग्नसराईसाठी अर्थात ऑक्टोबर २०२५ ते जून २०२५ या कालावधीसाठी असेल. आ. पवार कर्च करणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यात नायगाव मतदारसंघातील किमान दोन भगिनी (नवरी) असाव्यात, एवढी मापक अपेक्षा ठेवण्यात आली आहे.