

वसमतः तालुक्यातील गुंज येथील महिला मजूरांची घटना नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत असली तरी जिल्हा प्रशासनाच्या महसूल, पोलिस अन पंचायत विभागाच्या अधिकार्यांनी तातडीने स्थानिक अधिकार्यांना घटनास्थळी मदतीसाठी रवाना केली. त्यातून प्रशासनाच्या संदेनशिलतेचा प्रत्यय वसमत तालुकावासीयांना आला.
वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला हळद काढणीच्या कामासाठी आलेगाव (जि. नांदेड) शिवारात जात असतांना ट्रॅक्टर विहीरीत कोसळले. या अपघातात ७ महिलांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुंजच्या गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान हे घटनास्थळ नांदेड जिल्हयात येत असले तरी मजूरवर्ग हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच पुणे येथे बैठकीला गेलेल्या जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांना सुचना दिल्या. तसेच उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांना घटनास्थळी पाठविले. या सोबतच गावातील परिस्थिती व आवश्यक माहिती घेऊन मजूरांच्या कुटुंबियांना लागणार्या मदतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने गटविकास अधिकार्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले. तर ग्रामसेवकास गावात थांबून मदत करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान ही घटना वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीपासून काही अंतरावरच घडल्याने पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार मधुकर आडे, विजय उपरे यांना घटनास्थळी मदतीसाठी रवाना केले.