

नायगाव : तालुक्यातील सुजलेगाव तालुका नायगाव येथे सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान अचानक झालेल्या वादामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयासमोरील सार्वजनिक रस्त्यावर वाघ-वानर सोंग कार्यक्रम सुरू असताना ही घटना घडली.
कार्यक्रम शांततेत सुरू असतानाच काही व्यक्तींमध्ये अचानक वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर लगेचच हाणामारीत झाले. संबंधितांनी एकमेकांचे शर्ट पकडून झटापट करत शिवीगाळ व आरडाओरडा केला. त्यामुळे कार्यक्रमातील शांतता भंग झाली व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी गोविंद नारायण शिंदे, मारोती संभाजी वडजे, प्रल्हाद नारायण शिंदे, नारायण गोविंद शिंदे, बळीराम दिगांबर जाधव, रविराज बळीराम जाधव, मारोती हनमंत वडजे, आकाश दीपक जाधव, साईनाथ व्यंकटी शिंदे, सुनील यादव, भगवान श्रीराम शिंदे, दिगांबर व्यंकटी शिंदे, अतुल दीपक जाधव, रंजीत रंगराव देशमुख, साईनाथ शिवाजी जाधव व दत्ता हनमंत वडजे (सर्व रा. सुजलेगाव, ता. नायगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९४(२) नुसार कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास कुंटूर पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शिस्त व शांतता राखण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, अशा प्रकारांच्या पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.