

नांदेड : हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकावरील वाढती गर्दी आणि भविष्यातील विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानकावरील तीन पिट लाईन मालटेकडी येथे हलवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. खासदार अशोकराव चव्हाण यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या भेटीनंतर रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या नांदेड रेल्वे स्थानकाच्या मुख्य आवारात रेल्वे गाड्यांची स्वच्छता आणि तांत्रिक दुरुस्तीसाठी तीन पिट लाईन (विशेष ट्रॅक) आहेत. या ट्रॅकवर गाड्या दीर्घकाळ उभ्या राहत असल्याने नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी जागेची अडचण निर्माण होत आहे. या तिन्ही पिट लाईन जवळच असलेल्या मालटेकडी स्थानकावर हलवल्यास नांदेड स्थानकावर नवीन प्लॅटफॉर्मसाठी मोठी जागा उपलब्ध होईल, वंदे भारत सारख्या हायस्पीड गाड्यांसाठी आधुनिक सोयीसुविधा उभारता येतील, रेल्वे स्थानकाचा पुढील 30 वर्षांचा विस्तार आराखडा राबवणे सोपे होईल.
खा. अशोकराव चव्हाण यांनी रेल्वेमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नांदेड रेल्वे विभागाच्या सर्वांगीण विकासाची गरज अधोरेखित केली. मालटेकडी येथे तांत्रिक सुविधांचे स्थलांतर केल्यास नांदेड स्थानकावरील ताण कमी होऊन प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, असा मुद्दा त्यांनी मांडला. यावर रेल्वेमंत्र्यांनी प्रशासनाला हा प्रस्ताव प्राधान्याने मार्गी लावण्यास सांगितले आहे.
नांदेड-लातूर मार्गाचे स्वप्न साकार होणार?
नांदेड आणि लातूर या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे नांदेड-लातूर या नवीन रेल्वे मार्गावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, असे संकेतही मिळाले आहेत. मात्र या मार्गाचे स्वप्न कधी पूर्ण होणार हे येणारा काळच सांगू शकेल.
काय होईल फायदा?
मराठवाड्यातील दळणवळण यंत्रणा अधिक वेगवान होईल.
व्यापार आणि उद्योगाला मोठी चालना मिळेल.
येत्या काही आठवड्यांत या प्रकल्पाचा अधिकृत निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी महारेलच्या माध्यमातून आधीच प्राथमिक अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहेत. आता रेल्वे मंत्रालय यावर अंतिम मोहोर उमटवण्याच्या तयारीत आहे.
अशोकराव चव्हाण, खासदार